जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – संजय गांधी निराधार योजना समिती बरखास्त!
Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

सोमवारी हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना समिती बरखास्त केली (Sanjay Gandhi Niradhar Yojana Update). शासनाच्या आदेशाने २० ऑगस्ट २०१९ ला तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समित्या गठित झाल्या होत्या. शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने गटाचे झाकीर भालदार यांची २०२३ मध्ये अध्यक्षपदी वर्णी लागली होती. समितीमध्ये भाजपा, जनसुराज्य, अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली होती. मुख्यमंत्र्यांच्या इचलकरंजी दौ-यानंतर सर्व चक्रे फिरली असल्याची चर्चा भाजपा गोटात आहे. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेच समिती बरखास्त झाल्याने शिंदेसेना, भाजपा, जनसुराज्य यांच्या कार्यकत्यांमध्ये खलबते सुरू झाली आहेत. संजय गांधी समितीवर निवड होणार असे छातीठोक सांगून गुडघ्याला बाशिंग बांधून दुय्यम नेते तयार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच गेली सहा महिने संजय गांधी निराधार योजनेच्या समितीसाठी जनसुराज्य, भाजपा आणि शिंदेसेना मध्ये चढाओढ सुरू झाली होती. खासदार धैर्यशील माने गटाकडेच समिती राहावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वतंत्र पत्र काढून या समितीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे आदेश काढले होते. अचानक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती बरखास्तीचे आदेश काढल्याने तालुक्यात खळबळ उडाली.
हातकणंगले तालुक्यामध्ये ‘जनसुराज्य’चा आमदार असल्याने संजय गांधी समिती ‘जनसुराज्य’ला मिळावी यासाठी आमदार अशोकराव माने आग्रही होते. संजय गांधी समितीचे अध्यक्षपद आमदार स्वतःकडे ठेवतात का एखादा कार्यकर्ता पुढे येतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.